Recent Post

Popular Posts

गारपीट अवकाळी पावसाने नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश || Avkali Nuksan 2026

गारपीट अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश.

Avkali Nuksan 2026

राज्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

लातूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचमाने तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिल्या. पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्याकडून दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेतली.

रेणापूर, अहमदपूरसह इतरही तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. 

त्यामुळे संबंधित तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. यासोबतच घरांची पडझड झालेल्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी. 

आगामी काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार रेणापूर तालुक्यात सोमवारी काही ठिकाणी वादळी वारे व गारपीट झाली. यामुळे काही गावांमध्ये पत्र्याची घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच गहू, हरभरा व ज्वारी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

तसेच उदगीर तालुक्यातील वायगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दिगंबर राम बेलकुंडे (वय 60 वर्षे) यांचा मृत्यू झाला. इतरही तालुक्यातील नुकसानीची माहिती घेण्यात येत असून सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले